लातूर (प्रतिनिधी): सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राजमुद्रा फाऊंडेशनच्या लातूर जिल्हा समन्वयक पदी डॉ. ज्ञानेश्वर हरिश्चंद्र माने यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हयातील सामाजिक वर्तुळातून त्यांचे स्वागत होत आहे.राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. माने यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्क लक्षात घेऊन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. समाधान तुकाराम इंगवले यांच्या अनुमोदनाने आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. अमोल ठाकर यांनी ही अधिकृत घोषणा केली.डॉ. ज्ञानेश्वर माने यांच्यावर आता लातूर जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये फाऊंडेशनची संघटनात्मक बांधणी करणे, विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे आणि सर्व तालुक्यांच्या कामात सुसूत्रता आणणे, हे त्यांच्या कार्याचे मुख्य स्वरूप असणार आहे.आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना डॉ. माने यांनी फाऊंडेशनच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, संस्थेच्या ध्येय-धोरणांनुसार पारदर्शकपणे आणि निष्ठेने कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





